मुंबई : सन २०११पर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर अधिकृत मान्यता द्यावी, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ४०० स्क्वेअर फुटांचे घर देण्यात यावे, या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली.
‘सन २०११च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठीचा कायदा बनविण्यात आला असून, मान्यतेसाठी कायद्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर २०११च्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवलेंना दिली; तसेच या योजनेत किमान ३० ते ४० मीटरपर्यंतचे घर देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, जेथे शक्य आहे तेथे ४०० स्क्वेअर फूट घर देण्याचा निर्णयसुद्धा शासनाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आठवलेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिली.